विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सध्या राज्यात सत्ता स्थापेसाठी भाजपा - शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून राजकारण तापलेलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी एक सूचक विधान केल्याने भविष्यात राज्यात सत्तेचं नव समीरकरण पाहायला मिळतं की काय? अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असं विधान केलं आहे. तसेच, राष्ट्रवादी विरोधी पक्षातच बसणार असल्याचे सांगत, भाजपा - सेनेच काय ठरलं त्यांनाच माहित, आम्ही सरकारच्या चुका दाखवण्याचं काम करू असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी भाऊबीज सणा निमित्त एक लाख महिलांना साडी वाटप केल्यावरूनही टीका केली. आणखी वाचा- आम्ही विरोधीपक्षाची भूमिका बजावणार : जयंत पाटील अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदार संघातून भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांच्यासह उर्वरित सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव केला. पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त झालं. याबाबत बोलताना, “विधानसभा निवडणुकीत भाजपाने माझ्यासमोर सक्षम उमेदवार उभा केला होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मताधिक्याचे आकडे मी दबकत-दबकत सांगत होतो. पण, मतदारांनी मला मोठा आशीर्वाद दिला”, असं अजित पवार म्हणाले होते.