माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार तीन दिवसातच कोसळले. फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी महाविकास आघाडीला सत्तास्थापनेच आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या (२८ नोव्हेंबर) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कोण असेल अशी चर्चा सुरू झाली असून, तिन्ही पक्षातील काही नेत्यांची नावे आघाडीवर आहेत.

सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी (२७ नोव्हेंबर) सायंकाळी पाचवाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. पण, न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. त्यानंतर बहुमत नसल्याचं सांगत फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजपाचं सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन होत असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महाविकास आघाडीचं मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहेत. शिवसेनेला १६ मंत्रिपद, राष्ट्रवादीला १४ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नेमका कुणाचा समावेश होणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

तिन्ही पक्षातील ‘हे’ नेते आहेत स्पर्धेत

शिवसेना –
एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील.

राष्ट्रवादी –
धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे.

काँग्रेस –

अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सतेज पाटील आणि सुनील केदार.