शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष सरकार स्थापन करण्यास अंतिम टप्प्यात असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपाने सरकार स्थापनेचा दावा केला. त्याचबरोबर शनिवारी सकाळी राजभवनात शपथविधीही पार पडला. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. शुक्रवारी रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये स्थापन होईल, असे चित्र दिसत असतानाच अचानक शनिवारी सकाळी राज्यात भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या घटनाक्रमावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘भाजपावाले धरणातील पाणी ओंजळीने पितील’, असे एक ट्विट करून भाजपाला टोला लगावला आहे. “सिरियल किलर कडून लोकशाहीचा पुन्हा खुन! आता अजित पवार यांच्यावरील सर्व गुन्हे माफ होतील. भाजपा वाले धरणातील पाणी ओंजळीने पितिल! आणि आपण किती नैतिक आहोत, याचा डंका पिटवतील. रात्रीच्या अंधारात अनैतिक कर्म करण्यास मदत करणाऱ्या राष्ट्रपती व राज्यपालांबद्दल काय म्हणावे? वाईट आहे!”, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात झालेल्या घटना घडामोडीचा राष्ट्रवादीलाही धक्का बसला आहे. यावर शरद पवार यांनीही या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. पवार यांनी स्पष्ट केलं की, कोणतीही कल्पना न देता आमदारांना राजभवनात नेण्यात आलं. विशेष म्हणजे आमदारांच्या सह्या असलेल्या पाठिंब्याचं पत्र दाखवून राजपालांची फसवणूक करण्यात आली. अजित पवारांबरोबर दहा ते बारा आमदार आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर राजेंद्र शिंगणे माझ्या घरी आले. महाराष्ट्रात जनमत जे आहे ते भाजपाच्या विरोधात आहे. असं असताना त्यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाला जनता पूर्ण विरोध दर्शवेल”, असे शरद पवार म्हणाले. याशिवाय, जे आमदार अपात्र होतील, त्यांच्याविरोधात आम्ही तीन पक्ष काय करायचं ते करु,” असंही पवारांनी सांगितले.