महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील सत्तेचं चित्र बदललं. न्यायालयानं उद्या म्हणजेच 27 नोव्हेंबरला पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिलेले असताना त्याआधीच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कोसळलं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची मनधरणी करण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आलं. अजित पवारांनी दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बहुमत नसल्याचं सांगत आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला.