“राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार नाही,” अशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर केली. त्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर सणसणीत टोला लगावला आहे. “कालपर्यंत भाजपाचं नेतृत्व सांगत होतं की, मुख्यंत्री भाजपाचाच होणार. पण, भाजपा सत्ता स्थापन करणार नसेल तर मुख्यमंत्री कसा होणार,” असा सवाल करत “कोणत्याही किंमतीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल,”असा दावा राऊत यांनी केला.

वर्षावर बंगल्यावर दुपारी ४ वाजता भाजपाच्या कोअर कमिटीची दुसरी बैठक झाली. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याची माहिती दिली. सत्ता स्थापन करण्यात भाजपानं असमर्थता दर्शवल्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेनेकडं सगळ्याच्या नजर लागल्या आहेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी भाजपा सरकार करणार नसल्याची घोषणा केल्यानंतर संजय राऊत यांनीही माध्यमांशी संवाद साधला. खासदार राऊत म्हणाले, “कालपर्यंत भाजपाचं नेतृत्व सांगत होतं की मुख्यमंत्री आमचाच होणार. पण आता भाजपा सत्ता स्थापन करणार नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार? त्यांनी सरकार स्थापनेतून माघार घेतली आहे. त्यांचा सगळा अट्टाहास मुख्यमंत्रीपदासाठी होता. शिवसेनेशी झालेला करार पाळणार नाही ही कोणती भूमिका होती. भाजपा आता मुख्यमंत्री पदाचा हट्ट कसा पुरवणार?,” असा चिमटा राऊत यांनी भाजपाला काढला.

शिवसेना सरकार स्थापन करणार का? प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, “आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की, आगामी काळात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. महाराष्ट्राला कोणत्याही किंमतीत शिवसेनेचा मुख्यमंत्री देणार,”असंही राऊत यांनी सांगितलं.

मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार आहे. महाराष्ट्रात आपलच सरकार येणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी आमदारांशी बोलताना सांगितलं होतं. दुपारी मुंबईतील मालाड येथील हॉटेल द रिट्रिटमध्ये शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. आपण अजुनही युती तोडलेली नाही असंही ठाकरे म्हणाले होते.