राज्यामधील राजकीय पेच अधिक गुंतागुंतीचा होत असतानाच आता बहुमत सिद्ध करण्याचे राजकारण थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता कोण इथपर्यंत येऊन पोहचले आहे. राष्ट्रवादीचा गटनेता कोण ठरणार यावरुनच बहुमताचे आणि पर्यायाने सध्याचे सरकार टीकणार की पडणार याचा निकाल लागणार आहे. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार आहेत असा दावा भाजपा करत असली तरी राष्ट्रवादीने जयंत पाटील हे गटनेता असल्याचे म्हटलं आहे. यावरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु झाला. याच पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सचिवालयाकडे राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पवार असल्याचे पत्र मिळाल्याचे भागवत यांनी एनएनआयशी बोलताना सांगितले आहे. विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळाच्या सचिवालयामध्ये जयंत पाटील यांचे पत्र मिळाले असून ते आम्ही विधीमंडळाच्या अध्यक्षांना पाठवले आहे असं भागवत म्हणाले. "आम्ही विधिमंडळाच्या गटनेत्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकत नाही. तसेच जयंत पवार यांनी देलेले पत्र स्वीकारुन ते अध्यक्षांपर्यंत पोहचवण्याचे आमचे काम होते ते आम्ही केलं आहे," असं भावगत म्हणाले. "राष्ट्रवादीचे गटनेते कोण आहेत याबद्दल दोन्ही बाजूने दावा केला जात असला तरी त्याबद्दलचा अंतिम निर्णय हा अध्यक्षच घेतील," असंही भागवत यांनी स्पष्ट केलं आहे. गटनेतेपदी जयंत पाटील असल्याच्या बातम्यांमध्ये तुमचे नाव घेतले जात आहे यासंदर्भात भागवत यांना प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल बोलताना त्यांनी "मी माहिती दिली पण निर्णय आणि माहिती यामध्ये फरक असतो. विधिमंडळाचा सचिव याबद्दल निर्णय घेऊ शकत नाही. मी केवळ आम्हाला विधिमंडळ गटनेतेपदाचा दावा सांगणारे पत्र मिळाले असल्याची माहिती दिली," असं सांगितलं. #WATCH Rajendra Bhagwat, Maharashtra Legislature Secretary: The Legislature Secretariat has received a letter claiming that Jayant Patil is the Legislative Party Leader for NCP. But, decision has to be taken by the Speaker. As of today, decision has not been taken. pic.twitter.com/Hb2XZeZwNJ — ANI (@ANI) November 26, 2019 एकीकडे राष्ट्रवादी जयंत पाटील यांना आपला गटनेता असल्याचे सांगत असतानाच भाजपाने अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते असल्याचा दावा केला आहे. "जयंत पाटील यांच्या नावाने केवळ पत्र देण्यात आले असून त्याची नोंद करण्यात आलेली नाही. अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून दोनवेळा राज्यपालांशी संपर्क केला. जयंत पाटील यांनी दिलेले पत्र हे प्रतिदावा आहे. राष्ट्रवादीचा गटनेता कोण याचा अंतिम निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांचा असेल," असं भाजपाचे प्रवक्ते असणाऱ्या अशिष शेलार यांनी म्हटलं आहे.