बारामतीमधून धनगर समजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देत भाजपाने अजित पवार यांच्याविरोधात कडवी झुंज देण्याचा केलेला प्रयत्न फसलेला दिसत आहे. अजित पवारांनी ५० हजार मतांची आघाडी घेतली असून गोपीचंद पडळकर यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. २०१४ मध्ये गोपीचंज पडळकर भाजपाच्या तिकीटावर सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. तर २०१९ लोकसभा निवडणूक वंचितकडून सांगलीमधून लढले होते. यावेळी पुन्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशावेळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमधून निवडणूक लढणार का ? अशी विचारणा करत अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीर केली होती. पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. १९६७ पासून पवार कुटुंबातील व्यक्तीनेच विधानसभेत बारामतीचे प्रतिनिधीत्व केले आहे. १९६७ ते १९९० शरद पवार आणि त्यानंतर अजित पवार सातत्याने या मतदारसंघातून निवडून येत आहेत. मागच्या ५० वर्षात बारामतीमध्ये कुठलाही पक्ष पवार कुटुंबासमोर आव्हान उभा करु शकलेला नाही. १९६२ पासून ही जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिली आहे. आता भाजपाकडून गोपीचंद पडळकर यांना बारामतीमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्यांचा जनाधार तितका बळकट नाही. १९९१ सालच्या पोटनिवडणुकीपासून अजित पवार सलग सहावेळा निवडणूक जिंकले आहेत. ही त्यांची सातवी वेळ आहे. अजित पवार यांना २००९ साली १,२८,५४४ तर २०१४ साली १ लाख ५० हजार ५८८ मते मिळाली. मोदी लाटेतही अजित पवार यांच्या मताधिक्क्यामध्ये २२ हजारांची वाढ झाली होती. २०१४ मध्ये मिळालेली मते कायम राहतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला होता. १९९१ साली अजित पवारांनी त्यांची लोकसभेची जागा शरद पवारांसाठी सोडली होती. अजित पवार यांनी सर्वप्रथम १९८२ साली विजयाची चव चाखली. त्यावेळी ते सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले. राजकारणात एक एक पायरी चढत २००९ साली ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार सध्या राज्यात अन्यत्र प्रचारात व्यस्त असताना त्यांच्या पत्नी सुनेत्रा आणि मुलगा जय यांनी प्रचाराचा मोर्चा संभाळला आहे. ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये युतीला चांगलं यश मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर युतीला किती जागा मिळणार, यात भाजपाच्या किती जागा असतील याची सर्वत्र उत्सुकता आहे. १९८५ च्या निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याही एका पक्षाला १४५ चा जादुई आकडा गाठता आलेला नाही. १९९० मध्ये काँग्रेसला चार जागा कमी पडल्या होत्या. १९९५ पासून राज्यात युकी किंवा आघाडीची सरकारे सत्तेत आली. युतीला वातावरण अनुकूल असले तरी भाजपा किती जागांचा पल्ला गाठणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. भाजपाला १३० ते १३५ जागा मिळतील, असा दावा पक्षाचे नेते करीत आहेत. भाजपचे १४५चा जादुई आकडा गाठण्याचे स्वप्न यंदा साकार होण्याची शक्यता कमी दिसते. शिवसेनेचे मावळत्या सभागृहात ६३ आमदार होते. शिवसेनेच्या जागा वाढतात की घटतात याबाबतही लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या आमदारांची संख्या जास्त वाढू नये, असाच भाजपचा प्रयत्न होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पानिपत होईल, असा दावा युतीचे नेते करीत आहेत. गतवेळी काँग्रेस ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. तेवढे यश मिळाले तरीही आघाडीसाठी समाधानकारक असेल.