– शेखर जोशी

‘विजयी भव डोंबिवलीकर’ अशी मोठी होर्डिंग डोंबिवलीत लागली आहेत. डोंबिवलीकरांनी ‘कोथरुडकरां’चा राग आळवला तर? अर्थात कोथरुडमध्येही काही वेगळे घडणार नाही.

अर्थात इथे राग आळवायचे कारण वेगळे आहे. तसे झाले तर न भूतो…असे घडेल. पण शक्यता कमीच आहे. दगडाला शेंदूर फासून उभा केला तरी तो डोंबिवलीतून निवडून येईल, इतके ‘डोंबिवलीकरां’ना ‘डोंबिवलीकरा’ने गृहीत धरलेले आहे. पण यावेळी कदाचित मताधिक्य घटेल असे वाटते.
लोकसभेच्यावेळी राष्ट्रघातक्यांशी हातमिळवणी केल्यामुळे आणि ‘लाव रे तो व्हिडिओ’ च्या प्रयोगामुळे एक वर्ग ‘मनसे’नाराज आहे. खरे तर याच वर्गाने कडोंमपाच्या निवडणुकीत ‘मनसे’ मतदान केल्यामुळे संघ, भाजपाच्या बालेकिल्ल्यातही भाजप उमेदवारांना धूळ चारुन ‘मनसे’ उमेदवार निवडून आले होते. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

जनमानसातील विश्वासार्हता गमावलेल्या राष्ट्रघातक्यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातमिळवणी केली नसती तर त्याचा फायदा नक्कीच विजयी भव डोंबिवलीकरला अविजयी करण्यात झाला असता. केवळ ‘ आडनाव’ हा मुद्दा फार प्रभावी ठरेल अशी शक्यता नाही. तसे झाले तर तो मोठा चमत्कार म्हणावा लागेल. त्यामुळे फार काही धक्कादायक घडेल असे वाटत नाही.

कोथरुडप्रमाणेच डोंबिवलीही सुरक्षित मतदार संघ होता. पण…इकडे कोथरुड सारखे ‘सॉफ्ट’ टार्गेट नाही. असे झाले असते तर…

– इथल्या दादांनी त्या दादांनाही पाडले असते.
– बंडखोरी करून अपक्षही निवडणूक लढवली असती.
– किंवा पक्षांतरही केले असते.

आणि म्हणून तो धोका ‘मा.मुं.’ नी पत्करला नाही. शिवाय या दादांवर ‘मा.मुं’चाही खास वरदहस्त असल्याने पत्ता कापणे शक्यच नव्हते.

त्यामुळे…

मागील पानावरून पुढील पानावर…

पण तरीही प्रतिस्पर्ध्यालाही शुभेच्छा…