निवडणुकीच्या हंगामात येतो उखाळ्या पाखाळ्यांना बहर,
आधी आपण काय बोललो याचा सोयीस्कर पडतो विसर!

संपूर्ण सत्तेची मागणी खुद्द ‘राजा’ विसरतो
विरोधी पक्ष म्हणून तरी निवडून द्या असा हट्ट धरतो
आपणच सत्तेत असल्याचा विसर पडतो ‘सरकार’ला
‘सामना’ करण्याचा आदेश जातो एकनिष्ठ मावळ्याला
खंजीर, कोथळा, औरंगजेबाची अवलाद, होते इतिहासाची उजळण
जबड्यात घालुनी हात, मोजतो दात; होते शब्दांची पखरण
विसरले जातात हे शब्द मौतिक, अफजलखानावर बरसतं कवतिक
युवराजांचं तरी काय सांगावं? विसरण्यासाठी काही, जवळ तरी असावं?
त्यांच्या शागीर्दांचं तरी काय सांगावं? युवराज नाही राजमाता प्रमुख आहेत
हे दास दासी देखील विसरतात

राज्य करणाऱ्यांच्या विस्मरणशक्तीला दाद द्यावी तेवढी थोडीच…
पाडलेला पूल बांधायलाच ते विसरतात,
कुठला पूल? आम्हालाच पुसतात
पुलाचं कंत्राट त्याची निविदा,
त्याची टक्केवारी तेव्हा मात्र आठवते
निवडणूक आयोगाला जेव्हा पाच वर्षांनी जाग येते
प्रचारासाठी लागतो जेव्हा पैसा, कंत्राटदार वाटू लागतो हवाहवासा!

आपल्या मतदारांची तर बाबच आगळी, आमची फिलॉसॉफीच आहे जगावेगळी

विसरणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, यावर मतदार ठाम आहे,
जीडीपीचा दर शून्य टक्क्यावर आला,
बेरोजगारीचा दर आकाशाला भिडला,
तरी मेरा भारत महान आहे.

निवडणूक कुठली? प्रश्न कुठले? याचाच आम्हाला पडतो विसर
कॉर्पोरेशनच्या विलेक्शनला पुलवामावर देतो मताची मोहर

मतदान का करायचं हेच आम्ही विसरतो,
विश्वगुरू भारताच्या ‘गोची’ स्वप्नात दिनरात्र विहरतो
आपण युरोप अमेरिकेत आहोत याचा NRIना पडतो विसर
भारतमातेच्या आठवणीनं मनात अपार दाटतो गहीवर
राष्ट्रपिता नक्की कोण याचादेखील काहींना पडतो विसर
महात्मा राहतात भिंतीवर, प्रत्यक्षात होतो 56 इंची छातीचा गजर

येते जेव्हा मतदानाची वेळ, तेव्हा तर होतो खरा कहर…

काल कुणी पाजली मतदार राजाच विसरतो
मत नक्की द्यायचं कुणाला डोकं खाजवत बसतो