सत्तेची किळसवाणी हाव, निर्लज्जपणे केलेली पक्षांतरे आणि त्या पक्षांतरांचे तितकेच बेमुर्वत तत्त्वहीन समर्थन, राजकीय प्रचाराची बटबटीत, थिल्लर आणि हीन भाषाशैली, जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची चर्चा करणे सोडून मतदारांच्या भावना भडकवण्याचे सत्ताधारी पक्षांचे गारुड आणि त्याला माजी सत्ताधारी पक्षांची बेजबाबदार उत्तरे, आरोप-प्रत्यारोप, सर्वच पक्षांतून गुंड आणि गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या उमेदवारांचा आढळ या आणि इतर कारणांमुळे उद्विग्न होऊन २१ ऑक्टोबरला मी मतदान न करण्याचे ठरवले आहे, असे प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते विनय हर्डीकर यांनी सांगितले.

भारतीय लोकशाही परिपक्व व्हावी म्हणून मी केलेली धडपड सर्वाना माहीत आहे. मतदान करणे हे कर्तव्य आहे याची मला जाणीव आहे. तरीही मतदानावर बहिष्कार हा लोकशाही मार्ग मी स्वीकारला आहे. नोटाचा पर्याय मी ती तरतूद झाल्यापासून वापरला होता; मात्र त्यामध्ये आपण केवळ आपल्या मतदारसंघातले उमेदवार नाकारतो. सध्याच्या राजकीय संस्कृतीबद्दलची नाराजी त्यातून व्यक्त होत नाही, अशी भूमिका हर्डीकर यांनी मांडली.

शेतकऱ्यांमधील वैफल्य, सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या, आर्थिक व्यवस्थेची मंदावलेली गती, नैसर्गिक आपत्तीमध्ये हतबल होणारे सुस्त प्रशासन, वाढत चाललेली आर्थिक विषमता, बकाल शहरीकरण यांतल्या कशाचीही चर्चा न करता ‘सत्तेवर आल्यावर आम्ही हे प्रश्न सोडवू’, अशा उर्मट आवेशाने मतदारांना वारेमाप आश्वासने दिली जात आहेत. गरिबी संपवण्यासाठी धोरणात्मक रचना न बदलता, तुम्ही गरीब म्हणवून घ्या, सरकार तुम्हाला मदत करेल अशी लाचारी स्वीकारण्याची सवय जनतेला लावली जात आहे, याकडे हर्डीकर यांनी लक्ष वेधले.

यावर उपाय म्हणजे या कोलाहलापासून थोडे दूर होऊन विचार करण्याची गरज आहे. माझ्याप्रमाणे अनेक नागरिक उद्विग्न आहेतच! त्यांनी आपली भूमिका ठरवावी, कल्पना सुचवाव्यात म्हणजे निवडणुकीनंतर एकत्र बसून विचारविनिमय करून कृती कार्यक्रम बनवता येईल, असे आवाहनही त्यांनी केले.