माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सभागृहात उपस्थित नेत्यांनी भाषणं करीत फडणवीस यांचं अभिनंदन केलं. या ठरावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांच्या जुन्या विधानाचा हवाला देतं टोला लगावाला. “विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मान्यता देण्यात यावी अशी विनंती भाजपानं आपल्याकडे केली आहे. त्यामुळे अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मी भाजपाला मान्यता देत आहे. तसेच भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस हे १ डिसेंबर २०१९ पासून विरोधी पक्षनेते असतील असे मी जाहीर करतो,” असं सांगत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. त्यानंतर सभागृहात अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते म्हणून अभिनंदन करताना जयंत पाटील म्हणाले, "फडणवीसांनी अनेक वर्ष विधानसभेत काम केलं आहे. त्यांनी काय मुद्देसुद भाषणं केली. वॉर्ड अध्यक्षपदापासून त्यांची कारकिर्द सुरू झाली. त्यांनतर त्यांनी प्रसिद्धी प्रमुख म्हणून देखील काम केलं. त्या कामकाजाचा त्यांना गेल्या पाच वर्षात खुप फायदा झाला. प्रत्येक जण काम करतो पण एवढी प्रसिद्धी केली नाही," असं पाटील म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन, असा पुनर्उच्चार करण्यात आला. या विधानावरून जयंत पाटील यांनी फडणवीस यांना टोला लगावला. "मी आमच्या मतदारसंघात भाषण करताना म्हणायचो की मी निवडून आल्यानंतर सदनात पहिल्या रांगेत बसेल. कोणत्या बाजूला बसेल ते माहिती नाही पण पहिल्या रांगेत नक्की बसेन. त्यांच्या (फडणवीस) भाषणात ते म्हणाले परत येईन, सदनात कविता देखील मांडत त्यांनी मी परत येईन असं सांगितलं. पण, त्यांनी मी कुठे बसेन सांगितलं नव्हतं. त्यामुळे ते आता परत आले आहेत, तेही विरोधी पक्षनेते म्हणून," असा समाचार जयंत पाटील यांनी फडणवीसांचा घेतला.