शनिवारची सकाळ महाराष्ट्रासह राजकीय वर्तुळाची झोप उडवणार ठरली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार स्थापन करण्यास अंतिम टप्प्यात असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपानं सरकार स्थापनेचा दावा केला. त्याचबरोबर सकाळी राजभवनात शपथविधीही पार पडला. या घटनाक्रमावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी शपथविधी सोहळ्याला हजर असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी रात्री घडलेली हकिकत सांगितली.

वाय.बी. चव्हाण सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी स्पष्ट केलं की, कोणतीही कल्पना न देता आमदारांना राजभवनात नेण्यात आलं. विशेष म्हणजे आमदारांच्या सह्या असलेल्या पाठिंब्याचं पत्र दाखवून राजपालांची फसवणूक करण्यात आली. अजित पवारांबरोबर दहा ते बारा आमदार आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर राजेंद्र शिंगणे माझ्या घरी आले. महाराष्ट्रात जनमत जे आहे ते भाजपाच्या विरोधात आहे. असं असताना त्यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाला जनता पूर्ण विरोध दर्शवेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. १० ते ११ सदस्य त्यांच्यासोबत गेल्याचं समजतं आहे. जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात आम्ही तीन पक्ष काय करायचं ते करु,” असं पवार म्हणाले.

यावेळी शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे आणि संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवारी काय घडलं, याविषयीचा घटनाक्रम सांगितला. आमदार राजेंद्र शिंगणे म्हणाले, “आम्हाला अजित पवारांचा फोन आला. महत्वाची बैठक आहे. चर्चा करायची आहे. तातडीनं धनंजय मुंडे यांच्या घरी या, असं अजित पवार म्हणाले. पक्षाच्या नेत्यांचा आदेश म्हणून मुंबईत पोहोचलो. त्यानंतर कल्पना न देता आम्हाला राजभवनात नेण्यात आलं. तिथे गेल्यानंतर आम्हाला धक्का बसला. काही कळायच्या आतज शपथविधीही झाला. त्यानंतर राजभवनातून निघाल्यानंतर थेट शरद पवार यांची भेट घेतली. आम्ही पक्षासोबत आहोत. शरद पवार घेतील तो निर्णय आम्ही पाळणार आहोत, असं राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही या घटनाक्रमाला दुजोरा दिला.