राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीसह राज्यात राजकीय भूकंप आला आहे. एकीकडे अजित पवार यांच्याविरोधात काही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना असताना त्यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादीने मात्र आपण अद्यापही शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासंबंधी सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजही ट्विटरवरुन शेर शेअर केला असून हम होंगे कामयाब! असं सूचक विधान केलं आहे. ट्विटमध्ये काय म्हटलं आहे ? अगर फलक को जिद है बिजलियाँ गिराने की, तो हमें भी जिद है वहीं पर आशियाँ बसाने की . हम होंगें कामयाब । अगर फलक को जिद है बिजलियाँ गिराने की, तो हमें भी जिद है वहीं पर आशियाँ बसाने की . हम होंगें कामयाब ।@NCPspeaks @MumbaiNCP — Nawab Malik (@nawabmalikncp) November 25, 2019 राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शनिवारी घेतली. अचानक घडलेल्या या शपथविधीमुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अजित पवारांनी दिलेलेलं समर्थन हे वैयक्तीक आहे हा राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर रंगलेल्या राजकीय नाट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबामध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झालं. अजित पवार आणि फडणवीस यांच्यात खलबतं, रात्री बर्षा बंगल्यावर पार पडली बैठक काल रात्री उशीरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीत मंत्रिपदांबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाहीतर अजितदादांच्या गटाला १२ मंत्रीपदं १५ महामंडळं दिली जाणार असल्याची देखील माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे. अजित पवार यांच्या पाठीशी २७ आमदार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आलेला आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या पाठिंब्याने भाजपा बहुमत सिद्ध करु शकलं आणि सरकार स्थापना झाली तर अजितदादांच्या गटाला १२ मंत्रीपदं १५ महामंडळं दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. या भेटीत भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार बनणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. तर, भाजपाने मात्र ही बैठक फक्त बहुमत सिद्ध करण्यासंबंधी तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीसंदर्भात होती अशी माहिती दिली. याशिवाय भाजपा सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांसोबत युती करण्याआधीच मंत्रीपदात मिळणाऱ्या वाट्यासंबंधी चर्चा झाली होती.