“गेल्या सहा महिन्यात आर्थिक मंदीचे संकट वाढले आहे. बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी अडचणीत आले आहेत. आत्महत्या वाढल्या आहेत. एकंदरीत जनता हे सरकार बदलले पाहिजे, परिवर्तन झाले पाहिजे या मानसिकतेत आहे. त्यामुळे या निवडणुकीत २४ तारखेला निकाल येईल त्यावेळी महाराष्ट्रात परिवर्तन निश्चित होणार आहे,” असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

“अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोगाने २१ ऑक्टोबर ही मतदानाची तारीख जाहीर केली आहे. आम्हीही तयारीला लागलो आहोत. आम्हाला अपेक्षा होती की, २० – २१ ऑक्टोबरला निवडणूका होतील परंतु ज्यापध्दतीने घटनेमध्ये तरतुद आहे.त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने निवडणूका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात असे सांगितले आहे. त्या होतील याची अपेक्षा निवडणूक आयोगाकडून करतो,” असेही नवाब मलिक म्हणाले.

“लोकसभा निवडणुकीत ५० टक्के मते सेना-भाजपाला मिळाली होती. मतविभाजनाचा फायदा झाल्याने त्यांच्या जागा जास्त आल्या. यावेळी जनतेला कळून चुकले आहे की, मतविभाजनामुळे सेना- भाजपाच्या जागा येत आहेत. मात्र यावेळी लोकं मतविभाजन टाळतील,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.