शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी दिली आहे. याआधी सोमवारी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा सुरु नसल्याचं सांगितल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेची कोंडी झाली होती. मात्र आता शरद पवार यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा दोन ते तीन दिवसांत संपेल असं सांगत सकारात्मक संकेत दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवारांनी सांगितलं आहे की, शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात असून दोन ते तीन दिवसांत संपेल. आज सामायिक कार्यक्रम निश्चित होईल”. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत आज बैठक पार पडणार आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा पेच मुंबईत सुटत नसल्याने आता सर्व राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू नवी दिल्लीकडे सरकला आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा दोन-तीन दिवसांत सुटेल, असा विश्वास काँग्रेस आघाडीच्या उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात येत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक दिल्लीत पार पडणार आहे.

काँग्रेसचे राज्यातील नेते शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न असले तरी त्यातील अडथळे दूर झालेले नाहीत. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्यापही ठोस निर्णय घेतलेला नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी शिवसेना सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची काँग्रेसची प्राथमिक तयारी होती. मात्र, काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. हा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. काँग्रेस नेतृत्वाने शिवसेनेला पाठिंबा देण्यास अद्यापही होकार किंवा नकार कळविलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी यांनी मंगळवारी अहमद पटेल, ए. के. अ‍ॅन्टोनी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली. सत्ता स्थापनेचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते. काँग्रेसचे राज्यातील नेते मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल आहेत.

सोनिया गांधी भेटीत चर्चा झाली नसल्याचा पवारांचा दावा
गेल्या आठवडय़ात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर चर्चा झाली. पण, अशी काही चर्चाच झाली नसल्याचे शरद पवार यांनी सोमवारी सोनियांच्या भेटीनंतर सांगितल्याने विविध तर्कवितर्क लढविण्यात येत होते. नवी दिल्लीत बुधवारी पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला राज्यातील नेते उपस्थित राहतील. स्वत: पवार किंवा काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व यात सहभागी होणार नाही. किमान समान कार्यक्रम, सत्तापदांची वाटणी यावर बैठकीत चर्चा केली जाईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar shivsena uddhav thackeray congress maharashtra political crisis sgy
First published on: 20-11-2019 at 12:22 IST