'पवार काय बोलले याचा अभ्यास न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचा आणि खोटा प्रचार करत आहेत. ते किती खोटारडे आहेत हे आज सिद्ध झाले आहे,' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाशिक येथील सभेत मोदींनी आज टीका केली त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी त्यांना थेट आव्हान दिले आहे. पवारसाहेबांना पाकिस्तानचे शासक प्रशासक चांगले वाटतात ही देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी केला. 'पवार यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट सांगितले होते की, पाकिस्तानमधील राज्यकर्ते आणि सैन्यदल यांची भूमिका भारतविरोधी आहे. मात्र तेथील जनता तशी नाही. परंतु त्याचा खोटा प्रचार मोदी व फडणवीस करत आहेत' असेही मलिक म्हणाले. 'तुमच्याकडे संपुर्ण यंत्रणा आहे. तुम्ही पुर्ण व्हिडिओ बघा. पवार तुम्ही म्हणता तसं बोलले असतील तर आम्हाला दाखवा. आम्ही राजकारण सोडून देवू आणि तसे नसेल तर पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेची माफी मागावी,' अशी मागणी मलिक यांनी केली. 'पाकिस्तानातील शासक प्रशासक आम्हाला चांगले वाटत नाही तर ते मोदींना चांगले वाटतात म्हणून तर ते नवाज शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेले होते. मग इतरांवर आरोप मोदी का करतात', असा सवालही मलिक यांनी केला. नरेंद्र मोदी किती खोटारडे आहेत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. नाशिकच्या सभेत मोदींनी शरद पवार साहेबांबाबत चूकीची माहिती जनतेला दिली. साहेबांनी स्पष्ट सांगितले होते की पाकिस्तानातील राज्यकर्ते, सैन्य भारताविरुद्ध कुरघोडी करतात. मात्र मोदींनी साहेबांचे वाक्य फिरवून सांगितले. 1/2 — Nawab Malik (@nawabmalikncp) September 19, 2019 पंतप्रधान मोदी यांनाच पाकिस्तानचा जास्त पुळका आहे म्हणून २०१४ला नवाज शरीफांशिवाय त्यांना शपथ घेणे अवघड झाले होते. पुळका आहे म्हणूनच प्रोटोकॉल मोडत मोदी पाकिस्तानात बिर्याणी खायला गेले होते पवारांबाबत जो अपप्रचार मोदी करत आहेत तो सिद्ध करावा अन्यथा वक्तव्याबाबत माफी मागावी. 2/2 — Nawab Malik (@nawabmalikncp) September 19, 2019 भाषणात काय म्हणाले मोदी महाजनादेश यात्रेची समारोप सभा नाशिकमधील पंचवटीतील तपोवनात पार पडली. यासभेमध्ये मोदींनी पवारांवर टीका केली. 'शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील प्रशासन त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात?,' असे सवाल मोदींनी उपस्थित केले.