काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टीका करण्यासाठीही कुणी नेते शिल्लक राहिलेले नाहीत, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  अमरावती येथील  प्रचारसभेत शुक्रवारी केली.

ठाकरे म्हणाले, आघाडीतर्फे निवडणूक लढवण्यास कुणीही तयार नाही. जे तयार झाले, ते त्यांच्यासोबत राहतील की नाही, याची शाश्वती नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आमच्याकडे आले, ते म्हणतात काँग्रेसमध्ये दम नाही. खरी कामे करणारी माणसे युतीत आहेत. आज देशाला भगव्या विचारांची गरज आहे. आम्ही युती केली नसती, तर भलतेच सरकार डोक्यावर बसले असते. अनुच्छेद ३७० रद्द करण्यास विरोध असलेल्या काँग्रेसचे सरकार आम्हाला नको होते, असेही ठाकरे म्हणाले.