राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडय़ाळाचे काटे कायमचे बंद करा. महाराष्ट्राला राष्ट्रवादीमुक्त करा, त्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण स्वच्छ होणार नाही, अशी टीका महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी थेरगावात केली. चिंचवड विधानसभेचे भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, महापौर राहुल जाधव आदी उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारत आणि मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार केला आहे. फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्या राष्ट्रवादीने कायम जातीपातीचे राजकारण करून स्वत:ची पोळी भाजून घेतली. स्वत:ला नेता, जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी सत्तेची सगळी पदे स्वत:च्या घरात आणली. मराठा समाजाला ते आरक्षण देऊ शकले नाहीत. भाजप सरकारने ते करून दाखवले. लोकसभेत मतदारांनी राष्ट्रवादीला धडा शिकवला, तेच चित्र विधानसभेत राहणार आहे. उमेदवारही देऊ न शकणाऱ्या राष्ट्रवादीची हार स्पष्ट आहे. पिंपरी पालिकेत राष्ट्रवादी २० वर्षे सत्तेत होती. या काळात त्यांनी काहीच केले नाही. बारणे म्हणाले की, निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, मत वाया घालवू नका.