आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सत्ताधारी पक्ष ‘ईडी’चा पुरेपूर वापर करून घेत आहेत. कोणत्याही प्रकारे सत्ता आपल्या हातात कशी राहील, यासाठी सर्व प्रकारचा खटाटोप केला जात आहे. विरोधकांवर दबाव आणण्यासाठी सीबीआय, ईडी यांसारख्या संस्थांचा वापर केला जात असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.  गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक राजकीय नेतेमंडळींना ईडीची नोटीस आल्या आहेत. त्या विषयावर त्यांनी आपले रोखठोक मत मांडले.

सरकारच्या धोरणांवर टीका करताना पवार म्हणाले की, कधी नव्हे ते या निवडणुकीच्या वेळी फोन-टॅपिंगचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत आम्हाला मदत करा असं जरी कोणी कोणाशी बोलले; तरी संध्याकाळी त्यांच्याकडे ‘ईडी’चे पथक दाखल होते. अमाप साधनसंपत्तीचा वापर सत्ताधाऱ्यांकडून सध्या केला जात आहे. पण विरोधकांना मात्र या सर्वांबाबत कशाप्रकारे मर्यादित ठेवले जाईल, याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक थोडीफार विरोधकांसाठी प्रतिकुल परिस्थितीची आहे.

लोकसभा निवडणूक भाजपाकडून आक्रमकपणे लढवली गेली. राष्ट्रसुरक्षेच्या मुद्याचा गवगवा करून निवडणूक लढवण्यात आली. देशाच्या संरक्षणाचे मुद्दे हे केवळ एका पक्षाचे नसतात. सगळा देश यात समाविष्ट असतो. मात्र आज मुद्दाम असे प्रश्न निर्माण करून त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी व विरोधकांना नाऊमेद करण्यासाठी या मुद्द्यांचा वापर केला जात आहे. अशी परिस्थिती पूर्वी कधीच नव्हती. पण आता ती परिस्थिती दुर्देवाने आली आहे, अशी खंत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.