महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी युवासेनेचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांना बहुमुल्य राजकीय सल्ला दिला आहे. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबतच्या भुमिकेवर शिवसेनेने ठाम रहायला हवं असं त्यांनी सुचवलं आहे. तसेच शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपद आदित्य ठाकरेंनाच मिळावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. स्वतःचा अनुभवाचा दाखला देताना फेसबुकवरुन त्यांनी एका पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आदित्य ठाकरेंबाबत मैत्रीपूर्ण भावना व्यक्त करीत सत्यजीत तांबे आपल्या फेसबुक पोस्टमधील पत्रात म्हणतात, “२००७ साली मी २४ वर्षांचा होतो. त्यावेळी अहमदनगरच्या जिल्हा परिषदेवर मी निवडून गेलो होतो. यावेळी काँग्रेसला बहुमत असल्याने बहुतांश सदस्यांची मीच अध्यक्ष व्हावा अशी इच्छा असताना माझ्या कमी वयाचे कारण सांगत पक्षातील काही जणांनी माझ्याकडून ही संधी हिसकावून घेतली. त्यावेळी देखील बराच खल होऊन सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले होते.”

“त्यानंतर ठरल्याप्रमाणे अध्यक्षांनी काही आपले पद सोडलेच नाही. अखेर अडीच वर्षांनी पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि काँग्रेसने मला उमेदवारी दिली. मात्र, विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला. त्यामुळे माझी अध्यक्षपदाची संधी हुकली”, तांबे आपला अनुभव कथन करतात.

तांबे पुढे म्हणतात, “हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती.”