राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सर्वच पक्षांना सत्तास्थापनेत अपयश आल्यानं अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दरम्यान, काही दिवसांपासून शिवसेनेनं आपल्या आमदारांना आधी रंगशारदा आणि त्यानंतर द रिट्रिट हॉटेलमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर शिवसेनेने आपल्या आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाण्याचे आदेश दिले. दरम्यान, यावेळी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेचे आमदार फुटणार नाहीत. परंतु जो कोणी असा प्रयत्न करेल त्याचं डोकं फुटेल, असा इशारा लांडे यांनी दिला. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटला नसल्यानं आमदारांच्या फोडाफोडीच्या भितीनं अन्य पक्षांनी आपल्या आमदारांना अन्य ठिकाणी हलवल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. शिवसेनेनं आपल्या आमदारांना द रिट्रिट या हॉटेलमध्ये ठेवलं होतं. तर काँग्रेसनं आपल्या आमदारांना जयपूरमध्ये हलवलं होतं. दरम्यान रिट्रिट हॉटेलमधून निघताना लांडे यांनी शिवसेना आमदारांना फोडण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांचं डोकं फुटेल, असा इशारा दिला. आणखी वाचा- राजकारणात शिवसेनेने कधी व्यापार केला नाही : संजय राऊत सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांचा शिवसेनेवर विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या शिवसेनेवर विश्वास असून त्यांच्या अडचणीच्यावेळी त्यांच्या मदतीला जाण्याची आवश्यकता आहे. आम्ही खेडेगावातून आलो असून आम्ही शेतकरीच आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वांनी आपापल्या विभागात जाऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.