शिवसेनेचे आमदार फोडण्याची कोणाची हिंमत नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. शिवसेना आमदारांच्या फोडाफोडीच्या शंकेवरून त्यांना मुंबईतील हॉटेलमध्ये हलवण्याच्या वृत्तावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसंच त्यांनी अशाप्रकारच्या कोणत्याही वृत्ताचं खंडन केलं.

शिवसेनेच्या वाऱ्याला उभं राहायची हिंमत कोणीही करून दाखवावी. शिवसेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकायची कोणाची हिंमत नाही. आमचे आमदार निष्ठावान आहेत. आमचे आमदार फुटणार नाहीत याची खात्री आहे. त्यांना संपर्क करण्याची कोणाची हिंमत नाही, असं राऊत यावेळी म्हणाले. राज्यात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत आमदार फोडाफोडीच्या गोष्टी होत असतात. अनेक राज्यांमध्ये अशा गोष्टी झाल्या आहेत. पण महाराष्ट्रात आम्ही अशा गोष्टी होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत. ज्या पक्षाकडे १४५ आकडा असेल त्यांनी आपलं सरकार बनवावं. मी कोणत्याही प्रकारची शेरेबाजी नाही करत. मी केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका तुमच्या समोर मांडतो. मी केवळ पक्षाचं काम करत आहे, असंही ते यावेळी म्हणाले. आमच्या शुभेच्छा भाजपासोबत आहेत. त्यांनी आपलं बहुमत सिद्ध करावं. लवकरच गोड बातमी देणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणतात. पण गोड बातमी काय आहे, हे पहावं लागेल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच आहे, अशी गोड बातमी एक दिवस सुधीर मुनगंटीवार देतील, असंही त्यांनी नमूद केलं.

यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असेलेल्या संबंधांबाबतही आपलं मत व्यक्त केलं. मुख्यमंत्री आणि आमचे संबंध अतिशय चांगले आहेत. या गोष्टींमुळे आमच्या व्यक्तीगत संबंधात कोणतीही बाधा येणार नाही. हा राजकीय प्रश्न महाराष्ट्राच्या भविष्याशी निगडीत आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.