लीलावती रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेद्वारे पुन्हा एकदा शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना आणि भाजपामध्ये बंद दरवाज्याआड जी काही बोलणी झाली, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का सांगितली नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसंच ही बोलणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झाली. ती खोली आम्हाला मंदिरासमानच आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो आम्ही खोटं बोलणार नाही, असा घाणाघात राऊत यांनी यावेळी केला.

निवडणुकीदरम्यान आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतं मागितली. त्यामुळे निवडणुकीदरम्यान ठरवलेल्या गोष्टी त्यांना कळणं अपेक्षित होतं. आमचा त्यांच्याप्रती आदर आहे. बंद खोलीत ज्या गोष्टी ठरतात, त्यावर जेव्हा अंमल होत नाही त्यावेळी त्या बाहेर येतात, असं राऊत म्हणाले. तसंच ज्या खोलीत बसून बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा संदेश दिला, ज्या खोलीत बाळासाहेबत बसत असत त्या खोलीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. ती खोली म्हणजे आम्हाला मंदिरासमान आहे. या खोलीत झालेल्या गोष्टी खोट्या आहेत असं जर कोणी म्हणत असेल तर तो बाळासाहेबांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असल्याचं त्यांनी सांगितलं.

पंतप्रधानांना खोटं पाडण्याची इच्छा नाही
जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून करत होतो, तेव्हा शिवसेनेनं आक्षेप का घेतला नाही, असं शाह म्हणाले. आम्ही पंतप्रधानांचा आदर करतो आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्हाला ते करायचं नव्हतं. भाजपाला जरी त्यांचा आदर नसला तरी आम्ही त्यांचा आदर करतो. म्हणून आम्ही त्यावेळी त्यावर काही आक्षेप घेतला नाही. बंद दाराआडच्या चर्चा योग्य वेळी मोदींपर्यंत पोहोचल्या नाहीत. युती कोणत्या कारणामुळे झाली हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. आम्हाला पंतप्रधानांना खोटं पाडण्याची इच्छा नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

शिवसेनेला धमक्या देऊ नका
दरम्यान यावेळी राऊत यांनी भाजपाला अप्रत्यक्षरित्या इशारा दिला. ‘आम्हाला कोणीही धमक्या देऊ नका. त्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही प्राण देऊ, पण घाबरणार नाही. धमक्या देणाऱ्यांनाही संपवू,’ असंही ते म्हणाले.