महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी आता प्रचाराला जोर धरु लागला आहे. शिवसेनेने शनिवारी सकाळी आपला वचननामा जाहीर केला. घरगुती विजेच्या दर, गोर-गरिबांसाठी १० रुपयांमध्ये थाळी, शेतकरी यासारख्या अनेक मुद्द्यांवर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना, उद्धव ठाकरेंनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

आपल्या पहिल्या प्रचारसभेमधून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यंदा आपल्याला विरोधी पक्षात काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी जनतेसमोर केली होती. यावर प्रश्न विचारला असता, “पुढच्या वेळी ते फक्त पेपर वाचण्यापुरते निवडणुकीच्या मैदानात उतरतील”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज यांना टोला लगावला आहे. भाजपनेही आपल्या सोशल मीडियाच्या कँपेनच्या माध्यमातून राज ठाकरेंना टीकेचं लक्ष्य केलं आहे.

अवश्य वाचा – ‘अनाकलनीय’ फरक समजला ! भाजपाच्या ‘रम्या’चे राज ठाकरेंना डोस

“वचननाम्यात वचनं विचार करून देण्यात आली आहे. शिवसेना जे बोलते ते करते. राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे. १० रूपयांमध्ये अन्न देण्याचा घेतलेल्या निर्णयात आम्ही बचतगटांची मदत घेणार आहोत. तिजोरीवर कितीवर भार पडेल हा विचार करून आम्ही जेवण १० रूपयांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. समतोल ढळणार नाही याचा विचार करून वचननामा तयार केला आहे. यातलं एकही मत खोटं ठरणारं नाही,” असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थिती आज (शनिवारी) हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.