उद्या दुपारपर्यंत राज्यातील सत्तास्थापनेबाबत चित्र स्पष्ट होईल, असं मोठं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं. राज्यातील निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला. अशातच राज्यात अद्यापही सरकार स्थापन करण्यात कोणत्याही पक्षाला यश आलं नाही. त्यातच राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अशातच राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये सत्ता स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसंच डिसेंबर महिना उजाडण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं. सरकार स्थापनेतील सर्व विघ्न दूर झाली आहेत. राज्यातील राष्ट्रपती शासन दूर करण्यासाठी काही कायदेशीप बाबींमधून जावं लागतं. तसंच राज्यपालांना बहुमताचा आकडा पुरव्यांनीशी द्यावा लागतो. ती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि डिसेंबर महिना उजाडेपर्यंत सरकार स्थापन होईल, असंही ते म्हणाले.

राष्ट्रपती शासनादरम्यान कोणीही सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यास ते सरकार स्थापन करू शकतात. ज्या लोकांना वाटतं राज्यात लोकप्रिय सरकार येऊ नये, प्रदीर्घ काळ राष्ट्रपती शासन रहावं, शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये, असे लोक निरनिराळ्या बातम्या पेरत असतात, असंही त्यांनी नमूद केलं. आमच्यामध्ये कोणतेही दोन गट नाहीत. तसंच शिवसेनेत कोणताही संभ्रम नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.