महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे १६२ आमदारांचं सह्या असणारं पत्रं राज्यपालांकडे सोपवलं असून भाजपा बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यानंतर सत्तास्थापनेसाठी आम्हाला संधी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राजभवनात पत्र सोपवण्यात आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यपाल सांगतील तेव्हा आपण सर्व १६२ आमदारांची राज्यपालांसमोर परेड करण्यास तयार असल्याचं सांगितलं.

“आज आम्ही राज्यपालांना विधानसभेतील १६२ आमदारांच्या सह्या असणारं पत्र राज्यापलांना दिलं आहे. संख्याबळ नव्हतं असं सांगत भाजपाने असमर्थता दर्शवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्याकडे आजही पुरेसं संख्याबळ नसल्याने बहूमत सिद्ध करु शकणारच नाही. भाजपा असमर्थ ठरल्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच घटकपक्षांना सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी,” असं यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं.

आणखी वाचा- महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचे संसदेत पडसाद

यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आम्ही वेळ वाढवून मागितली असतानाही आमची मागणी राज्यपालांनी फेटाळून लावली होती. लोकशाहीची पायमल्ली करण्यात आली, तसंच लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रकार असल्याची टीका केली. संख्याबळ असतं तर दिवसाढवळ्या उजळ माथ्याने शपथ घ्यायला हवी होती असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

“लोकांमध्ये सरकारविरोधात रोष आहे. म्हणून आपण चांगलं काम करु शकतो असं दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,” असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. जयंत पाटील यांनी यावेळी आपण अजित पवारांची भेट घेणार असून यश आलं तर आनंद, अन्यथा पक्ष योग्य तो निर्णय़ घेईल अशी माहिती दिली. दरम्यान पत्रावर राष्ट्रवादीच्या ५१ आमदारांच्या सह्या असून ५४ पैकी ५३ आमदारांचं समर्थन असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.