विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटले तरी सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटू शकलेला नाही. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका करण्याचं सत्र सुरु ठेवलं आहे. संजय राऊत यांनी यावेळी माजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची एक कविता ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. आव्हानांपासून पळ न काढता, त्यांच्याशी दोन हात करणं गरजेचं आहे असा संदेश गीतेतून देण्यात आल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

संजय राऊत यांनी अटलबिहारी वाजपेयींची जी कविता ट्विट केली आहे त्यात लिहिलं आहे की, “आग्नेय परीक्षा की इस घड़ी में- आइए, अर्जुन की तरह उद्घोष करें: ‘‘न दैन्यं न पलायनम्।”.

याआधी बोलताना संजय राऊत यांनी भाजपा आणि शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर उद्धव ठाकरे ठाम आहेत. जर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर तर हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय होईल असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. नितीन गडकरी शिष्टाई करणार का? असं विचारलं असता, मुख्यमंत्रीपदाचं लेखी पत्र घेऊन नितीन गडकरी येणार असतील तर माध्यमांचा निरोप मी उद्धव ठाकरेंना देतो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- राज्यात १९९९ ची पुनरावृत्ती होणार? जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं

महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल का? असं जर माध्यमांना वाटत असेल तर महाराष्ट्रात पारदर्शकता शिल्लक नाही असंच म्हणावं लागेल असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र कधीही कोणाही समोर झुकणार नाही. शरद पवार जसे कोणाही समोर झुकले नाहीत तसंच उद्धव ठाकरेही कोणाही समोर झुकणार नाहीत असंही संजय राऊत म्हटले आहेत.

एवढंच नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपाचा डाव आहे असाही आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे मातोश्रीवर आले होते त्यांना भेट नाकारण्यात आली का? असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हाही मध्यस्थीसाठी कोणीही येण्याची गरज नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम आहे असंही सांगितलं.