मुख्यमंत्रीपद देण्यास तयार असतील तरच आम्हाला फोन करा, अन्यथा करु नका असा स्पष्ट संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात आमदारांची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचं सांगितलं. यामुळे शिवसेना-भाजपामधील तिढा अजून वाढण्याची शक्यता आहे.

लोकसभेदरम्यान जे ठरलं होतं ते मान्य करण्यास भाजपा तयार झाली असती तर आपण चर्चेस तयार होतो असं उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितलं. “जर आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यास तयार असतील, तर त्यांनी आम्हाला फोन करावा अथवा करु नये,” असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी बैठकीत बोलताना सांगितलं की, “आमचा पक्ष स्वाभिमानातून जन्माला आला आहे. आम्हाला भाजपाला बाजूला करण्याची इच्छा नाही. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अत्यंत चुकीचं होतं. जर ते मी खोटं बोलत होतो हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतील तर हे चुकीचं आहे. जर भाजपा दिलेला शब्द पाळणार नसेल तर मग चर्चा करण्यात काही अर्थ नाही”. मला युती तोडायची नाही, त्यामुळे भाजपाने काय तो निर्णय घ्यावा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या काही आमदारांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पदावर ठाम असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे शिवसैनिक, राज्याच्या हिताचा निर्णय घेतील असंही ते म्हणाले. बैठकीनंतर आमदारांची फोडाफोडी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेल रंगशारदावर पाठवण्यात आलं आहे. सर्व आमदार दोन दिवस हॉटेल रंगशारदामध्ये राहणार आहेत.

बैठकीनंतर बोलताना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी हिंमत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवावेत असं सांगत भाजपाला आव्हान दिलं आहे. “कोणी माई का लाल आम्हाला फोडू शकत नाही. आमदार म्हणजे काही भाजीपाला नाही. हिंमत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवावेत,” असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.