विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. तत्पूर्वी विविध एग्झिट पोल्सचा कल महायुतीच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा आपलीच सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना नव्या विधानसभेत मी नसेल याची आयुष्यभर खंत राहील, अशा शब्दांत भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

खडसे म्हणाले, “भाजपाला १४० पेक्षा अधिक जागा मिळतील असा मला विश्वास आहे. राज्यातील मजबूत विरोधीपक्ष नसल्याचा आम्हाला निश्चितच फायदा मिळेल. विधानसभेत जाता आलं असत तर मला आनंद झाला असता. विधानसभेशी माझं जवळचं नातं असल्याने नव्या विधानसभेत मी नसेल याची खंत आयुष्यभर राहील.” एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आजवर विधानसभेत मी माझ्या राजकीय जीवनातील मोठा काळ विरोधीपक्षाचा आमदार म्हणून घालवला आहे. आजवर मी जनतेच्या विविध प्रश्नांवर सभागृहात आक्रमकपणे प्रश्न मांडले आहेत, अशा प्रकारे माझ्यासाठी विधानसभा जवळची राहिली आहे. आक्रमकपणे प्रश्न मांडताना मला सभागृहातून निलंबित करण्यात आले होते तेव्हा भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनीही माझ्या या आक्रमकपणाचे कौतुक केले होते, अशी आठवणही खडसेंनी यावेळी सांगितली. मी नव्या सभागृहात नसल्याची खंत वाटत असली तरी नवे लोक इथे येतील याचा आनंदच आहे, असेही ते यावेळी म्हणाले.