विधानसभा निवडणुकीचा उद्या (गुरुवार) निकाल येणार आहे. यापार्श्वभूमीवर भाजपा कार्यालयात मिठाई बनवण्याची लगबग सुरु झाली असून याद्वारे भाजपाने आपल्या विजयोत्सवाला सुरुवात केली आहे.

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान पार पडले त्यानंतर लगेचच विविध माध्यमांचे एग्झिट पोलही जाहीर झाले. या पोलमधून पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २५० च्या जवळपास जागा जिंकून महायुतीचेच सरकार पुन्हा स्थापन होईल असा विश्वासही नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, उद्या (दि.२४) मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत राज्यात कोण सत्तेत येईल हे स्पष्ट होईल. या पार्श्वभूमीवर विजयाची खात्री असल्याने भाजपाने आपल्या कार्यालयामध्ये विजयाची जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यासाठी लाडू बनवण्याचे काम सुरु असून ५ हजार लाडूंचे वाटप केले जाणार असल्याचे सुत्रांकडून कळते.

मात्र, एग्झिट पोलचे मत काहीही असले तरी उद्या प्रत्यक्ष निकाल समोर आल्यानंतरच कोणाकडे सत्तेच्या चाव्या असतील हे स्पष्ट होणार आहे.