४० किलोचे दागदागिने.. अन् गंभीर गुन्हेही दाखल मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत यंदा राष्ट्रवादीचे घडय़ाळ सोडून भाजपाचे कमळ हाती घेणारे छत्रपती उदयनराजे यांची लढत माजी राज्यपाल आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्याशी होणार आहे. संपूर्ण देशाला आर्थिक मंदीची झळ बसत असतानाही उदयन राजे यांच्या उत्पन्नात मात्र लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच महिन्यांत दीड कोटींची भर पडली आहे. या राजघराण्याकडे सोने-हिऱ्याचे तब्बल ४० किलोचे दागिने आहेत. श्रानिवास पाटील यांनी वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण संस्थेस ६० लाखांचे कर्ज दिल्याचे समोर आले आहे. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्याने सातारा लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी पाटील आणि उदयनराजे यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती पुढे आली आहे. उदयनराजेंच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हेसुद्धा गर्भश्रीमंत आहेत. त्यांच्याकडे १० कोटींची जंगम तर ११ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या पाटील कुटुंबाने दागदागिने, बँकांमध्ये ठेवी, कंपनीत गुंतवणूक केली असून मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीस ६० लाखांचे कर्ज दिल्याची नोंद या प्रतिज्ञापत्रात आहे. संपत्ती किती? लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांची जंगम मालमत्ता १३ कोटी ८१ लाखांची होती. तर आता ती १४ कोटी ४४ लाखाच्या पुढे गेली आहे. त्यांच्याकडे सोने-हिऱ्याचे दागिने, कंठहार, शिरटोप असे सुमारे ४० किलोचे दागदागिने आणि ऑडी, मर्सिडिज बेन्झ, इण्डेवर अशा गाडय़ा आहेत. तसेच १८५ कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यात जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे. विशेष म्हणजे ‘सुखवस्तू’ हा आपला व्यवसाय असल्याचे नमूद करणाऱ्या राजेंवर एक कोटी ८२ लाखांचे वाहन कर्ज आहे. गुन्ह्य़ांची मोजदाद.. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या महाराजांवर खंडणी, कट रचून खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे असे २३ गुन्हे दाखल असून शरद लेवे खून प्रकरणातून सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असली तरी या निर्णयास राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.