नगर जिल्ह्य़ातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये पवार विरुध्द विखे कुटुंब यांचा संघर्ष पुन्हा एकदा पेटणार आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधून राम शिंदे यांना निवडून आणण्याची जबादारी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी माझ्यावर सोपवली आहे, असे सांगून भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी या मतदारसंघातील राजकारणात उडी घेतली आहे. कर्जत येथे सुजय विखे पाटील यांनी दि. २० रोजी कर्जत येथे समर्थकांचा मेळावा घेतला. यावेळी मित्रपक्ष असलेले शिवसेना,रासप आणि भारिप यांना देखील निमंत्रित केले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बळीराम यादव, दादासाहेब सोनमाळी, अंकुशराव यादव, तालुका प्रमुख दीपक शहाणे,भारिपचे अध्यक्ष संजय भैलुमे भानुदास हाके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. सुजय विखे पाटील म्हणाले, आमचा संघर्ष हा पवार कुटुंबाच्या सोबत पद्मश्री विखे यांच्यापासून सुरू आहे, आम्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षास जागा मागितली होती. त्यांनी सोडली नाही. शेवटी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचे जाहीर केले मात्र त्यांनी मदत केली नाही. अशावेळी भाजप सेना आणि मित्र पक्ष यांनी व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मदत केली हे कधीही विसरणार नाही. यामुळे त्यांचा उमेदवार जरी चांगला असला तरीही माझा विरोध त्या कुटुंबाला आणि पक्षाला आहे यामुळे आम्हाला दिलेली वागणूक कोणीही विसरू नये यामुळे येथे भाजपचे राम शिंदे यांना विजयी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री यांनी माझ्यावर सोपवली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यपद्धती चुकीची होती. त्यांनी त्यांच्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी दोन्ही निवडणुकीत कष्ट घेतले त्यांना मदत केली नाही ही चूक झाली आहे, मात्र ही वेळ चुका काढण्याची नाही तर पक्ष व भाजपचा उमेदवार म्हणून मतदान करावे.