शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचं सरकार राज्यावर आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. मात्र ट्विटरवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीपूर्वी #SorryBalaSaheb हे ट्रेंड होऊ लागले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार येत असल्याने ट्विटरवर काही नाराज ट्विटर युझर्सने बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे माफी मागत शिवसेनेला त्यांच्या आधीच्या भूमिकेची आठवण करून दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्तेवर येणाऱ्या महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या किमान समान कार्यक्रमाची माहिती दिली. नव्या सरकारने त्यांच्या विकास कार्यक्रमात स्थानिक भुमिपूत्रांच्या रोजगाराला प्राधान्य दिले आहे. उद्योग-व्यवसायात स्थानिक भुमिपूत्रांना ८० टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्यासाठी कायदा बनवण्यात येणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक भुमिपूत्रांना नोकऱ्यांमध्ये पहिले प्राधान्य मिळाले पाहिजे ही शिवसेनेची सुरुवातीपासूनची भूमिका होती.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करेल, तसेच युवकांना रोजगार आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून दोन्ही कुटुंबांमध्ये घरोब्याचे संबंध आहेत.