माळीण या गावावर आलेल्या आपत्तीनंतर भूस्खलनाचा धोका असणाऱ्या ११६ डोंगरांची यादी व त्याबाबतचा अभ्यास केंद्र सरकारकडे पाठविला असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक सुहास दिवसे यांनी दिली. माळीण गावाशेजारीच १६ पेक्षा अधिक डोंगर अधिक धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये धोका अधिक असल्याचे दिसून आल्याचे ते म्हणाले. माळीण हे गाव भूस्खलनामुळे रात्रीतून गायब झाले होते. तत्पूर्वी उत्तराखंडमध्ये झालेल्या घटनेमुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने या अनुषंगाने काम करण्यास सुरुवात केली आहे. भूस्खलन असे एका दिवसात होत नसते. तत्पूर्वी काही संकेत मिळत असतील. मात्र, ते कोणते हे सर्वसामान्य माणसाला कळत नाही. अनेक घटनांची नोंदच नसते. त्यामुळे घडलेली घटना अचानक आहे, असे वाटू लागते. भूस्खलनासारख्या घटना होऊ शकतील अशा जागांचे एक सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. पश्चिम घाटात व कोकणात या घटना होऊ शकतात, अशी ठिकाणे शोधण्यात आली आहेत. या ठिकाणांवर कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबतचा अभ्यास करण्यासाठी हैदराबाद येथील विद्यापीठासमवेत करार करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथील काही जण या अनुषंगाने जाणीव जागृतीचेही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय भूस्खलन धोका नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अशा ठिकाणांवर कोणत्या उपाययोजना करायच्या याचा नव्याने अभ्यास केला जात आहे. केरळमध्येही या प्रकारचे संशोधन झाले आहे. मात्र, त्याचे निष्कर्ष अजून हाती आले नाहीत. बहुआपत्तीप्रवण १४ जिल्ह्य़ांसाठीही महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतले जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.