राज्यात विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला होता. सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले होते, एवढच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली होती. यावरू भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. दरम्यान, या भाजपाच्या निलंबित १२ आमदारांना  निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. 

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राज्यात पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली होती. ४ ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, या पोटनिवडणूकीत भाजपाचे निलंबित बारा आमदार देखील मतदान करु शकणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधिमंडळ प्रशासनाला भाजपाच्या निलंबित बारा सदस्यांसाठी मुंबईतील विधान भवनाच्या परिसराबाहेर मतदानासाठी स्वतंत्र बूथ स्टेशनची तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत.

निलंबित असल्यामुळे १२ आमदार विधान भवनाच्या परिसरात येऊ शकत नाही. त्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूकीत मतदान करण्यासाठी त्यांची वेगळी व्यवस्था सरकारला करावी लागणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार २२ सप्टेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. हा अर्ज महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यावा लागणार आहे. आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी २३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता मुंबईत होणार आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर आहे. ४ ऑक्टोबर रोजी मतदान होईत तसेच त्याच दिवशी मतमोजणी देखील होईल. 

का झालं होत आमदारांच निलंबन

इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशनावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. निलंबनाच्या निषेधार्थ भाजपाने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला होता.

काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी

राजीव सातव यांचं १६ मे रोजी करोनामुळे निधन झालं होतं. त्यांच्या निधनामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. राज्यसभेच्या जागेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने रजनी पाटील यांचं नाव जाहीर केलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. रजनी पाटील यांचं नाव राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत देखील आहे. पण गेल्या वर्षभरापासून उमेदवारी रखडल्याने त्यांचं नाव राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलं आहे. भाजपाकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता भाजपा शेवटच्या क्षणी उमेदवार मागे घेऊन, निवडणूक बिनविरोध करणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरेल.