नागपूर विभागात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत वाटप तसेच मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयासाटी १६ कोटी ४८ लाख २५ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. आजच भंडारा दौऱ्यावर असतांना वडेट्टीवार यांनी या निधीची घोषणा केली व शासन निर्णय निर्गमित केला.

मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे पाणि सोडल्यामुळे गोसिखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे पाच मीटर पर्यंत उघडून पाणी सोडावे लागल्याने भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात १९९५ पेक्षाही मोठ्या प्रमाणात पूर आल्याने अनेक गावांत, शेतामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

या चारही जिल्हयातील आलेल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करतांना वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यात येणार असून, यासाठी महाविकासआघाडी सरकार पुरग्रस्तांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन दिले व दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दुरध्वनीव्दारे चर्चा करून पुरग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली.  त्यानुसार आज महसूल व वन विभागाने निधी मंजूरीचा शासन निर्णय निर्गमीत केला.

नागपूर विभागातील सहा जिल्हयातील मृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्णत: घराची क्षती झाली असल्यास कपडे, भांडी व घरगुती वस्तूंकरीता ८ कोटी ६६ लाख २५ हजार रूपये व घराची अंशत: क्षती झालेल्यांच्या मदतीसाठी ७ कोटी १५ लाख व मदत छावण्या चालविण्यासाठी ४७ लाख रूपये असा एकूण १६ कोटी ४८लाख २५ हजार रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. नागपूर जिल्हयासाठी ५ कोटी, वर्धा २ लाख २५ हजार, भंडारा ५ कोटी, गोंदीया १ कोटी, चंद्रपूर ५ कोटी व गडचिरोली जिल्हयासाठी ४६लाख रूपये निधी मंजूर झाला आहे.