मुंबई: करोनाच्या सुरुवातीच्या काळात असलेल्या अनेक निर्बंधांमुळे २०२० -२१ या आर्थिक वर्षांत राज्यातील वाहन खरेदी मंदावलेली असतानाच २०२१-२२ मध्ये मात्र वाहन खरेदीत वाढ झाली आहे. त्यातच विद्युत वाहनांच्या खरेदीसाठीही अनेकांनी पुढाकार घेतला आहे. २०२१-२२ या वर्षांत राज्यात १९ लाखांपेक्षा अधिक नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक खरेदी दुचाकींची झाली आहे. शिवाय एकूण झालेल्या नवीन वाहन नोंदणीत जवळपास ५१ हजार ३७१ विजेवर धावणाऱ्या चार चाकी आणि दुचाकी तसेच अन्य वाहनांचा समावेश आहे. मार्च २०२० पासून टाळेबंदी लागताच वाहन खरेदी कमी झाली. वाहन नोंदणीच होऊ न शकल्याने एप्रिल २०२० ते जून २०२० पर्यंत आरटीओच्या तिजोरीत खडखडाट होता. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर विविध कारणांमुळे वाहनखरेदीकडे ओघ वाढला. अनेकांनी वाहतुकीसाठी रेल्वे, परिवहन बस किंवा खासगी बस याचा पर्याय निवडण्याऐवजी दुचाकी, चार चाकी वाहन खरेदी करण्यावर भर दिला. त्यामुळे अन्य क्षेत्रांच्या तुलनेत वाहन उद्योग क्षेत्र लवकर उभारी घेत असल्याचे चित्र होते. मात्र, मार्च २०२१ पासून वाढलेला करोनाचा संसर्ग आणि त्यानंतर लावण्यात आलेले निर्बंध यांमुळे या क्षेत्राची चाके पुन्हा रुतली. याचा परिणाम आरटीओच्याही (प्रादेशिक परिवहन कार्यालय) महसुलावर झाला. मात्र करोनाची दुसरी लाटही ओसरताच हळूहळू निर्बंध शिथिल झाले आणि राज्यातील वाहन खरेदीत पुन्हा वाढ होऊ लागली. परिवहन आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ मध्ये १६ लाख ९६ हजार ७५० नवीन वाहनांची खरेदी झाली असून यामध्ये १२ लाख २४ हजार ७९७ दुचाकी, तर ३ लाख ७५ हजार ४९७ चारचाकी वाहने आहेत. त्यानंतरच्या आर्थिक वर्षांत वाहनांच्या खरेदीत वाढ झआली आहे. जवळपास १९ लाख ११ हजार ९३४ नवीन वाहनांची नोंद झाली आहे. दुचाकी वाहन खरेदीतही ही वाढ असून १३ लाख ११ हजार ५२६ दुचाकींची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. तर ४ लाख ५७ हजार ३२५ चार चाकी वाहने आहेत. तर जड, अवजड वाहने, कमी क्षमतेच्या मालवाहतुकीची वाहने, तीनचाकी वाहने, प्रवासी बस अशा अन्य वाहनांचीही खरेदी झाली आहे. त्यामुळे राज्यात सध्याच्या घडीला ३ कोटी १५ लाखांहून अधिक वाहने रस्त्यावर धावत आहेत. विद्युत वाहनांच्या खरेदीत वाढ पेट्रोल, डिझेलवर धावणाऱ्या वाहनांची खरेदी मोठय़ा प्रमाणात होत असतानाच विजेवर धावणाऱ्या वाहनांचीही खरेदी होत आहे. त्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे. प्रदूषण न होणे, खरेदीवर सवलत यामुळे विद्युत वाहनांच्या खरेदीकडेही ग्राहकांचा कल दिसत आहे. २०२१ ते २२ या आर्थिक वर्षांत ५१ हजार ३७१ विद्युत वाहनांची खरेदी झाली असतानाच २०२०-२१ मध्ये ९ हजार ४१४ वाहनांची खरेदी झाली होती. महागडय़ा वाहनांचीही खरेदी २०२१-२२ मध्ये महागडय़ा वाहनांची खरेदी काहीशी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईत तर स्कोडा, फॉक्सवॅगन वाहनापाठोपाठ मर्सिडीज, फेरारी, टोयाटो,जॅगवार लॅण्ड रॉवर, बीएमडब्लू, पोर्शे जर्मनी, रोल्स रॉयस, ऑडी, व्हॉल्वो, टाटा इत्यादी कंपन्यांच्या वाहनांच्या खरेदीकडेही कल आहे. सर्व महागडय़ा गाडय़ांची किंमत २० लाख रुपये आणि त्यापेक्षा जास्त असल्याचे आरटीओतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना १३ टक्के आणि त्यापेक्षा जास्त वाहन कर लागला आहे. त्यामुळे आरटीओच्या तिजोरीतही मोठी रक्कम जमा झाली आहे.