श्री शंकर कारखानाही पुन्हा सुरू सोलापूर : सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ४२ पैकी २४ कारखान्यांच्या गळीत हंगामासाठी धुराडे पेटले आहे. आणखी १८ कारखान्यांचे गाळप परवाने प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांनी गळीत हंगामासाठी साखर आयुक्तालयाकडे परवाने मागितले होते. त्यापैकी २६ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. त्यापैकी २३ कारखान्यांचा प्रत्यक्ष गळीत हंगामाचा प्रारंभ झाला आहे. यंदा जिल्ह्यात दोन लाख ९० हजार ५५८ हेक्टर क्षेत्रात ऊस उपलब्ध होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एक लाख हेक्टर क्षेत्रात उसाचे जास्त उत्पादन होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विविध प्रमुख दहा साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस एफआरपीपोटी सुमारे १०२ कोटींहून अधिक थकबाकी ठेवली होती. साखर आयुक्तालयाने एफआरपीची थकबाकी रक्कम अदा केल्याशिवाय संबंधित साखर कारखान्यांना गाळप परवाना दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यामुळे संबंधित कारखाने सुतासारखे सरळ होऊन गळीत हंगामासाठी परवाना मिळण्याकरिता एफआरपीची थकीत रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करायला सुरुवात केली. बहुतांशी कारखान्यांनी एफआरपी चुकती केली आहे. गाळप परवाना मिळालेल्या आणि गाळप हंगाम सुरू केलेल्या साखर कारखान्यांमध्ये प्रामुख्याने माळशिरस तालुक्यातील श्रीपूरचा पांडुरंग सहकारी कारखाना, अकलूजचा सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, माढा तालुक्यातील पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यांसह सिद्धश्वर (सोलापूर), गोकुळ (धोत्री, दक्षिण सोलापूर), व्हीटी शुगर (तडवळ, अक्कलकोट), लोकमंगल (भंडारकवठे, दक्षिण सोलापूर), लोकमंगल (बीबी दारफळ, उत्तर सोलापूर), सिद्धनाथ शुगर (ताऱ्हे, उत्तर सोलापूर), विठ्ठल शुगर (म्हैसगाव, माढा), कमलादेवी (करमाळा), जर्यंहद शुगर (आचेगाव, द. सोलापूर) आदी कारखान्यांचा समावेश आहे. माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगरचा, श्री शंकर सहकारी साखर कारखाना दिवंगत माजी मंत्री प्रतार्पंसह मोहिते-पाटील व त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र धवर्लंसह मोहिते-पाटील यांच्या ताब्यात होता. हा साखर कारखाना बंद पडत जवळपास अवसायानात निघाला असतानाच भाजपचे नेते, आमदार रणजिर्तंसह मोहिते-पाटील यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करून या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात यश मिळविले आणि हा कारखाना अवसायानात निघण्यापासून रोखला गेला. निवडणुकीत हा कारखाना आमदार रणजिर्तंसह मोहिते-पाटील यांच्या ताब्यात आल्यानंतर आता शासनाकडून मदत घेऊन कारखाना पूर्ववत सुरू होत आहे. उद्या बुधवारी माजी उपमुख्यमंत्री विजर्यंसह मोहिते-पाटील यांच्या हस्ते या कारखान्याच्या गळीत हंगामाचा,शुभारंभ होत आहे. तर सांगोला येथील अनेक वर्षे बंद राहिलेला सांगोला शेतकरी सहकारी कारखानाही उस्मानाबादच्या धाराशिव साखर कारखान्याने चालविण्यासाठी घेतला आहे. त्याप्रमाणे हा कारखानाही सुरू होत आहे.