हिंगोली : जिल्ह्याला अतिवृष्टीतील नुकसानीपोटी २९७.२५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एसडीआरफच्या नियमानुसार २०२ कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना शासनाने वाढीव मदत मंजूर केल्याने त्यासाठीचे ९४ कोटी रुपये मिळणार आहेत. तूर्त यापैकी ७५ टक्के निधी वितरित करण्यात आला असल्याने अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ९०३ शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. जिल्ह्यात जिरायतीचे २ लाख ९४ हजार २८३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी एसडीआरफच्या धोरणानुसार २०० कोटी तर वाढीव दराने ९४.२७ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. आश्वासित सिंचनाखालील पिकांचे १ हजार ९०० शेतकऱ्यांचे १ हजार १८४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यात एसडीआरफच्या दरानुसार १.५९ कोटी तर वाढीव दराने १७.७६ लाखांची मदत मिळणार आहे. बहुवार्षिक पिकांचे ७७० शेतकऱ्यांचे ४८० हेक्टरचे नुकसान झाले. त्यात एसडीआरएफच्या दरानुसार ८६.३८ लाख तर वाढीव दराने ३३.५९ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. जिल्ह्यात एकूण ३ लाख ३१ हजार ५७३ शेतकऱ्यांचे २ लाख ९५ हजार ९४७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यात एसडीआरएफच्या दराने २०२.५७ कोटी रुपयांची मदत होणार आहे. यापैकी १५१.९३ कोटी रुपये एवढी रक्कम शासनाने वितरित केली आहे तर वाढीव दराने जिल्ह्याला ९४.६८ कोटी मिळणार आहेत. यापैकी ७१ कोटी रुपये वितरित केले आहेत.