अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी पिल्यामुळे ५० जणांची प्रकृती खराब झाली होती. या सगळ्यांना डायरिया झाल्याचे निष्पन्न झाले होते. या नागरिकांपैकी ३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची बातमी कळताच दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत रुग्णांची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा- विदर्भात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस; ‘गोसीखुर्द’चे दहा दरवाजे उघडले

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

रुग्णांवर तातडीने उपचार करावेत तसेच गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असली तरीही उर्वरित लोकांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरुन दिली. सर्व रुग्णांना योग्य उपचार मिळतील तसेच मृतांचा आकडा वाढू नये यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा- सोलापूर, विजापूर भागात भूकंपाचे सौम्य धक्के

पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर

मेळघाटात दिवसेंदिवस पाणी टंचाईची परिस्थिती भीषण होत चालली आहे. मेळघाट, चिखलधरा लगतच्या आसपासच्या गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मात्र, लोकप्रतीनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीक करत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे नागरीकांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर करावा लागत आहे. गढूळ पाणी पिल्यामुळे गावात अनेकांना खोकला, पोट दुखी, सारखे आजार जडले आहेत 

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना केवळ निवडणुकीच्या वेळेसच मेळघाट आठवतो का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. नवनीत राणा सोबतच जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचे सुद्धा मेळघाटच्या पाणी टंचाईकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.