नांदेड, छत्रपती संभाजीनगर : भारत-पाकिस्तान युद्धाची व्याप्ती वाढत चालली आहे. दोन्ही बाजूंनी बॉम्ब व मिसाईलचा मारा सुरू असून, जम्मू-काश्मीर व दिल्लीमध्ये पर्यटकांनी येणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ९० टक्के पर्यटकांनी आपल्या नियोजित सहली रद्द केल्या आहेत. याबरोबरच हिमाचल प्रदेश, हरियाणा, सिमला, कुलू, मनाली या भागातही पर्यटक जाण्यास कचरत आहेत.

उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात सर्व परीक्षा पार पडून सुट्या लागतात. यामुळे हौशी पर्यटक सहकुटुंब सहलीसाठी थंड ठिकाणी अर्थात उत्तर भारतातील पर्यटनस्थळांना पसंती देतात. रस्ते, रेल्वे व हवाई असे तिन्ही मार्ग नांदेडकरांसाठी प्रशस्त झाले असल्यामुळे लोक प्रामुख्याने जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेश या भागात पर्यटनास जातात. मागील महिन्यात २२ तारखेला पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळीसुद्धा असंख्य मराठी कुटुंबे काश्मीरमध्ये उपस्थित होते. त्याच वेळी अनेक जणांची तेथे जाण्याची तयारीही सुरू होती.

छत्रपती संभाजीनगरमधील टूर ऑपरेटर संघटनेचे अध्यक्ष जसवंतसिंग म्हणाले, ‘भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या सहली ठरलेले प्रवासी आता तिकिटे रद्द करू लागले आहेत. परदेशातून भारतात होणाऱ्या पर्यटनात अद्यापि कोणताही फरक पडलेला नाही. मात्र, देशांतर्गत पर्यटनावर परिणाम अधिक आहेत. मलेशियासह अन्य देशांतील पर्यटन मात्र सुरू आहे. डेक्कन ओडिसी ही रेल्वेगाडी संभाजीनगरला नियोजित वेळेवर येणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ‘घर में घूस के मारेंगे’ असा इशारा दिला होता. त्यानुसार ७ मे रोजी पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर मिसाईल मारा करण्यात आला. तेव्हापासून युद्धाला तोंड फुटले आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानने सीमेवर गोळीबार केल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता या विषयाला गांभीर्य प्राप्त झाले असून, पर्यटकांनी जम्मू–काश्मीरमध्ये येणे टाळावे, अशा सूचना जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे नांदेड परिसरातील सुमारे १० ते १५ हजार पर्यटकांनी जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील नियोजित सहली रद्द केल्या आहेत.

दरम्यान, संधी सोडायची नाही अशी भूमिका असलेल्या उत्साही पर्यटकांनी दक्षिण भारतातील पर्यटनस्थळाबाबत विचारणा सुरू केली असून, प्रामुख्याने केरळकडे लोकांचा ओढा दिसून येतो. त्याबरोबरच कर्नाटकातील म्हैसूर, उटी, लक्षद्वीप या ठिकाणी गर्दी वाढू शकते, असे मत पर्यटन क्षेत्रातील काही अनुभवी व्यावसायिकांनी व्यक्त केले. वातावरणात लक्षणीय बदल झाल्यास मराठवाड्यातील पर्यटक पश्चिम महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटन, तसेच कोकणातील निसर्ग पर्यटन अनुभवण्याच्या मन:स्थितीत असल्याचे दिसून येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नांदेडमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या सुमारे ४० टक्क्यांनी घटली असून, गुरुद्वारा दर्शनासाठी परदेशातून, तसेच दिल्ली, चंडिगड, अमृतसर या भागातून भाविक नांदेड येथे येत असतात. वर्षाकाठी १० ते १२ लाख भाविक नांदेडमध्ये येतात. त्यात मे व जून महिन्यात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते.