रत्नागिरी जिल्ह्य़ातील ९ तालुक्यांमधील एकूण ९६ गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असून या गावांच्या एकूण १९२ वाडय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठय़ाची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील खेड तालुक्यात सर्वाधिक गावांना (२६) पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, त्या खालोखाल संगमेश्वर (२१), चिपळूण (१८), दापोली (११), राजापूर (९), लांजा व गुहागर (प्रत्येकी ५), तर मंडणगड तालुक्याच्या एका गावात पाणीटंचाई आहे. या सर्व गावांना मिळून २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान, जिल्ह्य़ातील प्रस्तावित ७९ विंधन विहिरींपैकी ६८ कामे पूर्ण झाली असून, त्यापैकी ५१ विहिरींना पाणी लागले आहे. त्यामुळे संबंधित गावांमधील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे नमूद करण्यात आले आहे.