औरंगाबाद शहरातील राजीव गांधी नगर भागात राहणाऱ्या वैष्णवी जाधव या १२ वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. डेंग्यू तापामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. महापालिका प्रशासनच या मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहे असा आरोप आता काँग्रेसकडून केला जातो आहे. तसेच याप्रकरणी महापालिका आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका १२ वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला, त्याचमुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. औरंगाबादच्या राजीव गांधी नगर भागात राहणाऱ्या वैष्णवी जाधव या सहावीत शिकणाऱ्या मुलीला ताप आला, त्यानंतर तिला एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. डेंग्यू तापाची लागण या मुलीला झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे. औरंगाबादच्या राजीव गांधी नगर या भागात स्वच्छतेचा अभाव आहे. तसेच महापालिकेकडून कोणत्याही प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात आलेली नव्हती. त्याचमुळे वैष्णवीच्या मृत्यूला महापालिका अधिकारीच जबाबदार आहेत असा आरोप काँग्रेसचे गटनेते जगताप यांनी केला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि वैष्णवीच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जावी अशीही मागणी त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.