नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना ६० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी सोमवारी अटक करण्यात आली. ही कारवाई औरंगाबाद येथील पथकाने केली. या प्रकरणाने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. हेही वाचा- राज्यपालांना पदमुक्त करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक संकेत कंधार येथील एका सेतू सुविधा केंद्राच्या तक्रारीची कारवाई टाळण्यासाठी ही लाच घेण्यात आली. तक्रारदाराच्या नातेवाईकाबद्दल या विभागाकडे चौकशी अर्ज प्रलंबित होता. ही कारवाई टाळण्यासाठी उदगीर येथील दोघेजण त्यांच्याकडे गेले आणि हे प्रकरण संपुष्टात आणतो, म्हणून त्यांच्याकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोड होऊन ७० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाने तक्रारीची शहानिशा केल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी सापळा लावला होता. पहिला हप्ता म्हणून ६० हजार रुपये स्वीकारल्यानंतर सय्यद शकील, सय्यद ईस्माईल या दोघांना अटक करण्यात आली. हेही वाचा- आचारसंहितेमुळे पुणे जिल्हा ग्रामपंचायतींमधील कामांच्या प्रशासकीय मान्यता लांबणीवर या दोघांविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई औरंगाबादचे पोलीस उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे आणि पोलीस निरीक्षक रेशमा सौदागर यांच्या पथकाने केली. हे प्रकरण नांदेड जिल्ह्याशी संबंधित असल्याने त्याचा तपास नांदेड येथील पोलीस निरीक्षक वांद्रे यांच्याकडे देण्यात आला. पुढील तपासात येथेच कार्यरत असलेल्या महिला पोलीस निरीक्षक मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने या दोघांनाही ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.