महाराष्ट्रातून तीन महिन्यांच्या कालावधीत काही प्रकल्प परराज्यात गेल्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यात आता केंद्र सरकारने पुण्यातील रांजणगाव येथे 'इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर' उभारण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. या प्रकल्पासह आगामी वर्षात राज्यात 'टेक्स्टाईल क्लस्टर' उभारण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितलं आहे. यावरून शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी फडणवीस यांनी टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "वेदान्त-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि टाटा एअर प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यानंतर यापेक्षा मोठा उद्योग राज्याला मिळेलं, असं गाजर दाखवण्यात आलं होतं. पण, आकड्यांमध्ये आम्ही खेळ करु शकत नाही, कदाचित त्यामुळे आमचं सरकार पडलं असेल. आकडे दुसऱ्याचे घेऊन आपले कसं दाखवयाचं आणि घटनाबाह्य सरकारं कसे बनवायचं, यामध्ये काही लोक माहीर आणि जादूगर असतात. त्यांनी पुन्हा एकदा आकड्यांचा खेळ केला आहे," असा टोमणा आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला. हेही वाचा : “बच्चू कडू माझ्या फोननंतर गुवाहाटीला गेले”; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर अदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांचं विधान…” "मला हे माहिती नव्हते, एक लाख ४९ हजार कोटींपेक्षा जास्ती मोठा आकडा दोन हजार कोटींचा आहे. दीड लाख कोटी रुपये कुठं आणि दोन हजार कोटी रुपये कुठं. प्रत्येक पैसा आणि प्रत्येक रुपया राज्यातील गुंतवणूकीचा महत्वाचा असतो. देवेंद्र फडणवीस असो अथवा उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची घोषणा ते कधीच करत नव्हते," असा टोलाही 'इलेक्ट्रिक क्लस्टर पार्क'वरून आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.