प्रबोध देशपांडे अकोला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. अमरावती ते चिखलीपर्यंतचे काम चार टप्प्यांत होत असून सरासरी ४८ टक्के काम पूर्ण झाले. जुलै २०२३ पूर्वी चौपदरीकरणाच्या सर्व टप्प्यांचे काम पूर्ण करण्याची कंत्राटदारांना मुदत असून त्यापूर्वीच महामार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरील अमरावती ते नवापूपर्यंतच्या चौपदरीकरणाच्या कामाला २०१३ मध्ये मंजुरी मिळाली. ४८०.७९ कि.मी. लांबीच्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची अमरावती ते चिखली (नांदुराअगोदरचे गाव) १९४ कि.मी. आणि फागणे ते नवापूर १४०.७९ कि.मी. अशी कामाची विभागणी झाली. या चौपदरीकरणाच्या कामाला गत आठ वर्षांमध्ये विविध अडचणी व अडथळय़ांचा सामना करावा लागला. अगोदर ‘एल अँड टी’ कंपनीने जमीन अधिग्रहणासह विविध कारणांवरून काम सुरू करण्यापूर्वीच सोडून दिले. त्यानंतर अमरावती ते चिखलीपर्यंतचे २२८८.१८ कोटी रुपयांचे कंत्राट ‘आयएल अॅण्ड एफएस’अंतर्गत असलेल्या ‘आयटीएनएल’ कंपनीकडे होते. ‘आयएल अॅण्ड एफएस’ आर्थिक डबघाईस आल्याने काम बंद पडले. कामाची रखडपट्टी झाली. अनेक वर्षे काम अर्धवट अवस्थेत पडून राहिले. ‘बीओटी’वर काम करणे अडचणीचे झाल्याने ‘हायब्रीड अॅन्युटी’ तत्त्वावर काम करण्याचा निर्णय झाला. अमरावती ते चिखली १९४ कि.मी.च्या कामाची चार भागांत विभागणी झाली. नव्याने निविदा प्रक्रिया राबवून पहिल्या दोन टप्प्यांसाठी राजपथ इन्फ्रा, तिसऱ्या टप्प्यासाठी ‘मोन्टे कॉर्लो’ व चौथ्या टप्प्यासाठी कल्याण टोल्सला काम देण्यात आले. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिन्ही कामांना कार्यारंभ आदेश दिला. पहिल्या टप्प्यातील कामाला गेल्या वर्षी जुलैमध्ये कामाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी, तिसऱ्या टप्प्याला गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, चौथ्या टप्प्याला मेमध्ये, तर दुसऱ्या टप्प्याचे काम जूनमध्ये सुरू झाले. काम सुरू झाल्यापासून दोन वर्षांत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. गत वर्षांपासून महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. पावसाळय़ातसुद्धा याचे काम सुरूच होते. पहिल्या दोन टप्प्यांतील १०४ कि.मी.च्या रस्त्याचे सरासरी ३० टक्के, तर तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचे ६६ टक्के काम पूर्ण झाले. सरासरी ४८ टक्के काम झाले. अपेक्षेपेक्षा लवकर काम होत असून, याच गतीने विनाअडथळा कामे सुरू राहिल्यास कामाच्या मुदतीच्या आत महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. नवीन मार्गावरून वाहतूक महामार्गाचे सरासरी ४८ टक्के काम पूर्ण झाल्याने वाहतुकीला अडथळा नको म्हणून विविध टप्प्यांत पूर्ण झालेल्या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अकोला ते बाळापूर व बाळापूरपासून पुढे बहुतांश भागांत नवीन मार्गावरून वाहतूक सुरू आहे. अमरावती ते अकोलादरम्यान बोरगाव मंजू जवळ २८ किमीचा मार्ग खुला करण्यात आला. बोरगाव मंजू येथील वळणमार्ग सुरू झाला असून बाभुळगाव येथील वळणमार्गसुद्धा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे. मूर्तिजापूर ते बोरगावमंजू दरम्यानचे काम अपूर्ण व अडचणीचे असल्याने त्या मार्गात वाहतुकीला काही प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. महामार्गामध्ये तीन ठिकाणी पुलाच्या बांधकामासाठी रेल्वेच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. राष्ट्रीय महामार्ग सहाच्या चौपदरीकरणाचे चारही टप्प्यांत वेगाने काम सुरू आहे. सरासरी ४८ टक्के काम पूर्ण झाले. काही ठिकाणी वाहतूकसुद्धा सुरू करण्यात आली. लवकरच महामार्ग निर्माणाचे काम पूर्ण होईल. - विलास ब्राह्मणकर, प्रकल्प संचालक तथा महाव्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण