वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. वेदान्ताबरोबरच इतर प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून इतर राज्यात गेले आहेत. दरम्यान, राज्यातल्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी आज पुण्यातील वडगाव मावळ येथून जनआक्रोश आंदोलनाला सुरूवात केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.

हेही वाचा – मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ४ दिवसांची सीबीआय कोठडी

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“राज्यातले सरकार हे खोके सरकार आहे. मुळात हे सरकार नसून सर्कस आहे. हे बेकायदेशीर सरकार आहे. त्यामुळे लवकरच हे सरकार कोसळणार आहे. आज सरकारमध्ये काम करताना आमच्या गटात कोण येते आहे, याकडेच त्याचे लक्ष आहे. मात्र, राज्यातला तरुण रोजगार मागतो आहे, त्याकडे त्यांचे लक्ष नाही”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकावर केली आहे.

“आज राजकारणाची पातळी खालावली आहे. गणपतीच्या मिरवणुकीत आमदार बंदूक काढतो, हे योग्य नाही. या ४० गद्दारांनी आमच्यावर कितीही वार केले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. हे ४० गद्दार आज थयथयाट करत आहे. माझे ४० गद्दारांना आव्हान आहे, तुमच्या हिंमत असेल तर निवडणूक लढवून दाखवा, आपल्या आमदाराकीचा राजीनामा द्या, तुमच्याबरोबच मी सुद्धा राजीनामा देतो. हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढवून दाखवा”, असे आव्हानही त्यांनी शिंदे गटाला दिले.

हेही वाचा – “तुम्ही खोक घेऊन ओक्के झालात, मात्र…”; ‘जनआक्रोश’ मोर्चात आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

आतापर्यंत महाराष्ट्रातून तीन प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांच्या हातातील रोजगार देखील बाहेर गेले. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री स्वतः साठी दिल्लीला गेले. परंतु, राज्यासाठी ते दिल्लीला एकदाही गेले नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.