वेदान्त-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प परराज्यात गेल्याची माहिती समोर आणल्यानंतर आता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पाच्या नोकर भरतीसाठीच्या मुलाखती चेन्नईमध्ये होणार असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी समोर आणली. लोकांच्या हिताचं काम करणाऱ्या मविआ सरकारला पाडून आलेल्या या सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. भूमीपुत्रांवर अन्याय मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने होतोय का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह घटनापीठासमोरील खटल्यांची ‘लाईव्ह’ सुनावणी होणार नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? “वर्सोवा वांद्रे सी लिंकचे काम अनेक दिवसांपासून बंद होते. आमच्या काळातही यासंदर्भात बैठका घेण्यात येत होत्या. हा पहिला उड्डाण पूल असणार आहे, ज्यावर चार टोल बसवण्यात येणार आहे. हे काम अनेक दिवसांपासून बंद असल्याने या कामाचे कंत्राटदार बदलण्यात आले आहेत. मात्र, मी अनेक दिवसांपासून बोलतोय की आपल्या राज्यात प्रत्येक ठिकाणाहून नोकरीसाठी लोक येतात. कालपरवा माझ्या माहितीत एक धक्कादायक प्रकार आला आहे. वर्सोवा वांद्रे सी लिंकची कंपनी बदलल्यानंतर दुसऱ्या कंपनीकडे याचे काम देण्यात आले. या नवीन कंपनीने नोकरीसाठी जाहिरात काढली आहे. मात्र, याच्या मुखाखती चेन्नईत होत आहेत. हा प्रकल्प आपल्या राज्यात होणार आहे. मग आपल्या राज्यातल्या मुलांना नोकरीची संधी का दिली जात नाही? दुसऱ्या राज्यात का मुलाखती घेतल्या जातात?” , असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. “मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठे आहे?” “भूमिपुत्रांच्या मुद्यावरून काल परवापर्यंत आमच्यावर अनेक आरोप करण्यात येत होते. मात्र, आता या नोकऱ्यांसाठी महाराष्ट्रात कुठेही जाहिराती नाहीत. त्यामुळे एमएसआरडीसीच्या खात्यात इतका गंभीर प्रकार होत असताना मुख्यमंत्री नेमके काय करत आहेत?” असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. “यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात. एकतर हा सर्व प्रकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार सुरू आहे किंवा याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष नाही”, असा आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. “हा एका कंपनीपुरता विषय जरी असला, तरी महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. गेल्या सात वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे खाते आहे. या सर्व प्रकारातून महाराष्ट्रातील तरुण तरुणींचे आर्थिक खच्चीकरण सुरू आहे”, असेही ते म्हणाले. हेही वाचा - “…तर आम्ही उद्धव ठाकरेंचं स्वागत करू” महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत राहुल शेवाळेंचं मोठं विधान शिंदे गटाला लगावला टोला “गेल्या दोन आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी एमटीएचएलची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच याचे ८० टक्के काम पूर्ण झाले होते. तसेच त्यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. मला आनंद या गोष्टीचा आहे की जी कामं उद्धव ठाकरेंनी सुरू केली, ती काम आता ६० टक्क्यांच्यावर पूर्ण झाली आहेत. त्याची पाहणी आता सुरू आहे. त्यामुळे ४० गद्दारांना आमचं काम दिसत आहे”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.