पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 'ईडी' कोठडीत असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते संजय राऊत यांना आज १०० दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांना 'ईडी'कडून अटक करण्यात आली होती. दरम्यान, राऊतांना जामीन मिळाल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच तोफ पुन्हा रणांगणात आली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. हेही वाचा - मोठी बातमी! संजय राऊत यांना जामीन मंजूर, पत्राचाळ प्रकरणी झाली होती अटक! “संजय राऊतांना जामीन मिळाला, याचा आनंद आहे. खरं बोलणारा प्रत्येक नागरिक या निर्णयाचे स्वागत करतो आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, या देशात, राज्यात आपण हुकूमाशाहीच्या दिशेने जातो आहे का? यावर सर्वांनी विचार करण्याची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. हेही वाचा - ठाकरे गटाला मोठा धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार “जो व्यक्ती राज्य सरकारविरोधात बोलतो, त्यांची चौकशी लावू, तुरुंगात टाकू अशा धमक्या दिल्या जातात. याचा अर्थ जे राजकीय मंडळी सत्य बोलण्याचा प्रयत्न करतात किंवा एखाद्या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर यंत्रणांचा वापर करून कारवाई करण्यात येते. आज हा प्रकार राजकीय नेत्यांविरोधात होत आहे, उद्या हाच प्रकार पत्रकार आणि इतरांबाबतही होऊ शकतो. हे वातावरण लोकशाही आणि संविधानासाठी योग्य नाही”, असेही ते म्हणाले. हेही वाचा - “हा तर दिल्लीनं राज्याच्या माथी मारलेला महादळभद्री…”, ठाकरे गटाची एकनाथ शिंदे सरकारवर आगपाखड! “संजय राऊत हे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते उगाच मुखवटा लाऊन फिरत नाहीत. त्यांच्यावर दबावतंत्र वापरल्यानंतरही त्यांनी गद्दारी केली नाही. ते गुवाहाटीत पळून गेले नाहीत आणि ते डरपोक नाहीत, हे आता लोकांसमोर आले आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.