नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा व मुळा आणि नाशिक जिल्ह्य़ांतील गंगापूर, दारणा या धरणांमधून मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयावर सोमवारी नाशिक आणि नगर जिल्ह्य़ांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नाशिकमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केले. दसऱ्यानंतर ही आंदोलने अधिक आक्रमक रूप धारण करतील, असे स्पष्ट होत आहे. नगरमध्ये संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर येथे नागरिकांनी रस्त्यावर उतरून मोर्चे काढले. या आंदोलनात सत्ताधारी भाजपचेही पदाधिकारी सहभागी झाले आहेत. नाशिकमध्ये मात्र शिवसेनेने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य करून भाजप-शिवसेनेतील कलहात या पाणी प्रश्नाचेही निमित्त केले आहे. निर्णय घेताना नाशिकचे पालकमंत्री असलेल्या महाजन यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोप शिवसेनेने केला आहे. नाशिकच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीची माहिती महामंडळासमोर मांडली होती, जिल्ह्य़ातील धरणांमधून पाणी देणे अशक्य असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून एकतर्फी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेला, असा आरोप करून शिवसेनेच्या आमदारांनी गंगापूर धरणावर जाऊन आंदोलन केले. नाशिक व नगर जिल्ह्य़ातील पाच धरण समूहांतून १२.८४ टीएमसी अर्थात १२ हजार ८४० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडी धरणात समन्यायी तत्त्वावर सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला आणि यावरून नव्या लढाईला सुरुवात झाली आहे. मराठवाडय़ाला पाणी देण्यास नाशिक, नगरमधून विरोध होणे अपेक्षित होते. काँग्रेस, राष्ट्रवादीने या निर्णयास विरोध दर्शविला आहे, मात्र नाशिकमध्ये प्रामुख्याने शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेऊन भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केले. नगरमध्ये झालेल्या आंदोलनांत भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.